Thursday, February 12, 2009

संभा

"संभा...या दोन पेपर्सच्या झेरॉक्स आणुन दे बाबा.....!"
संभा..ही फाईल अकाउंट्मध्ये नेवुन दे रे..............!
संभा......काल बाईंडिंगसाठी दिलेला प्रोजेक्ट रिपोर्ट आणलास का परत.........!
संभाजी.....अरे, त्या एसी सर्व्हिसींगवाल्याला फोन करायला सांगितला होता तुला, तो अजुन उलथला नाही...!
संभा....दोन चहा...............!
संभा......तो कालचा ड्राफ्ट चेक केलास....प्रत्येक गोष्ट किती वेळा सांगायची रे तुला...?
संभा.............?
हे रोजचंच होतं तेव्हा, हि वाक्ये कानावर आल्याशिवाय आमचा दिवसच मुळी जात नसे. आणि स्वतः संभालाही त्याशिवाय ऑफीसला आल्यासारखं वाटत नसेल. मुळात संभा कोण...हे आतापर्यंत तुमच्या लक्षात आले असेलच म्हणा. तरी देखिल सांगतो. संभा आमच्या ऑफिसचा प्युन कम क्लार्क कम टेलिफोन ऑपरेटर कम पोस्ट्मन कम........बरंच काही.
संभाजी तुकाराम जाधव. ७-८ वर्षांपुर्वी सातार्‍याजवळच्या कुठल्याशा खेड्यातुन नोकरीच्या शोधात संभा मुंबईला आला. गावाकडे तीन एकर शेती ( बहिणीच्या लग्नात गहाण पडलेली)..दोन खोल्यांचं एक जुनाट घर...आणि त्या घराइतकीच जुन, जर्जर झालेली, थकलेली वृद्ध आई. वडील संभाच्या लहानपणीच...........................एका तमासगिरीणीच्या नादी लागुन परागंदा झालेले.
गावातल्या शाळेत कसे बसे एस. एस. सी. करुन संभा नोकरीच्या शोधात मुंबईला मामाकडे आला होता. परळच्या बी.डी. डी. चाळीत मामाच्या घरी...घरी म्हणण्यापेक्षा घरासमोरच्या बाल्कनीत राहात होता. बिचारा मामा तरी काय करणार, त्याची स्वतःची तीन लेकरे, बायको.......अगदी सख्खा भाच्चा असला तरी एकुलत्या एक खोलीत किती जण राहणार...! मामी बिचारी रोज वेळेवर जेवायला वाढत होती हेच नशीब. पण संभा बहुदा हे सगळं गृहित धरुनच आला होता.
तेव्हा मी ठाण्याच्या एका छोट्याशा फर्ममध्ये सेल्स/सर्व्हिस इंजिनीअर म्हणुन काम करत होतो. तो दिवस अजुनही आठवतो. दुपारी एक- दिड वाजला होता. आम्ही सगळे डबे उघडुन उदरं भरणंचे पवित्र कार्य आटपत बसलो होतो. एक काळा सावळा, किडकिडीत मुलगा आत आला. त्यावेळचं आमचं ऑफीस म्हणजे १५ X २५ चा एक लंबुळका हॉल होता. एक पार्टिशन घालुन बॉसची केबीन बनवली होती. बाकी टेबलच्या दोन रांगा..एकुण पाच टेबलं....आणि आणखी एक पार्टिशन घालुन दर्शनी बाजुला रिसेप्शनिस्ट्चे टेबल. त्यामुळे कोणीही आले की लगेच दिसायचे. अशात तो आला..साहेबांना भेटायचेय म्हणाला. त्याला बसायला सांगुन आम्ही पुन्हा एकदा डब्यावर तुटुन पडलो. मध्येच मला काय वाटले कुणास ठाउक मी त्या मुलाला हाक मारली, नेहेमीच्या सवयीप्रमाणे" या जेवायला," ..मी आपला सहजच म्हणालो होतो, पण तो खरोखरच आला आणि चक्क जेवायला बसला...बाकीची चांडाळ चौकडी " असंच पाहिजे...कुणी सांगितला होता नसता आगावुपणा...?" या अविर्भावात माझ्याकडे पाहत होती. तो व्यवस्थित जेवला. जेवता जेवताच कळालं कि तो नोकरीच्या शोधात आलाय म्हणुन. मग तर .....? , नंतर आमचा छान उद्धार होणार हे भवितव्य मला कळुन चुकले.
तो साहेबांना भेटला. त्याचं नशीब खरोखर जोरावर असावं, आधी फुकटचं जेवण आणि आता तर दरमहा आठशे रुपये (?) पगाराची नोकरी. उद्यापासुन येतो म्हणुन तो गेला.जेवण करुन मी आमची धोकटी उचलली आणि बाहेर पडलो. तर तो खालीच उभा होता. मी साहजिकच रेंगाळलो..तो पुढे आला..."खुप उपकार झाले साहेब. तुम्हाला वाटले असेल..ओळख ना पाळख, बोलावले कि आला अन बसला जेवायला. पण काय करु साहेब, सकाळपासुन फिरतोय. खिश्यात होते तेवढ्या पैशात दादर पासुन ठाण्यापर्यंतचं तिकीट काढलं...भुक लागली होती पण.....तशात तुम्ही बोलावलं...खुप लाज वाटली पण मन घट केलं अन तसाच निर्लज्जासारखा जेवलो. आता इथुन परळपर्यंत चालत जायचं म्हणजे अंगात ताकद पायजे ना? येतो साहेब...उद्यापासुन येतोय कामाला. तो निघाला..
मला काय वाटलं कोण जाणे पण त्याला म्हंटलं चल कुर्ल्यापर्यंत सोडतो तुला. त्यावेळेस माझी चेतक होती."हमारा बजाज.". कुर्ल्याला जाईपर्यंत तो अखंड बडबड करत होता.आपल्या पळुन गेलेल्या बापाबद्दल आणि अडकुन बसलेल्या आईबद्दल सांगत होता.उतरताना मी त्याला १०० रुपये दिले आणि सांगितलं ." महिन्याचा पास काढुन घे ट्रेनचा, पुढच्या महिन्यात पगार झाला की दे परत".त्याने फक्त हात जोडले.आता विचार केला कि माझं मलाच आश्चर्य वाटतं, कसलीही ओळख नसताना, त्याची कसलीही माहिती नसताना मी त्याला तेव्हा कसे काय पैसे दिले असतील? कारण मी तसा काटकसरी माणुस आहे. (आता माझ्या मित्रांची काटकसरीपणाची व्याख्या कंजुष अशी आहे, यात माझा काय दोष?)
पण त्यानंतर संभा आमच्यात रुळला. इतका रुळला की त्याच्यावाचुन आमचं पान हलेना झालं. झलक वर दिलेली आहेच. शिक्षण फारसं नव्हतं एवढंच काय ते त्याचं न्युन. पण त्याचं त्यामुळे काहीही अडत नसे. हळु हळु बॉसला सुद्धा संभाची सवय लागत गेली. तो हुशार तर होताच. पण पडेल ते काम करायची तयारी आणि नविन गोष्टी शिकुन घ्यायची ईच्छा या मुळे हळु हळु तो सगळ्यांचाच लाडका बनला. दोन वर्षे हा हा म्हणता निघुन गेली. एके दिवशी संभा पेढे घेवुन आला.....विशाल सर बारावी झालो...६५% मिळाले."अरे तु अभ्यास कधी केलास, परिक्षा कधी दिली?..पण ग्रेट यार....मानलं तुला.........!"सर, रात्रीच्या शाळेतुन शिकतोय. आता पण एखाद्या नाईट कॉलेजमध्ये अँडमिशन घेवुन पुढे शिकायचं ठरवलंय...!"मी अवाक झालो. मी कधी पासुन ठरवतोय बाहेरुन ME करायचं म्हणुन , पण मुहुर्त लागत नाही...आणि हा......................ग्रेट !असेच काही दिवस गेले, मी त्याला विद्यापिठात घेवुन गेलो आणि पाठक सरांशी ओळख करुन दिली. आमच्या कंपनीने मुंबई विद्यापिठात काही फॅक्स मशीन्स विकली होती, त्याची सर्व्हिसिंग मीच पाहायचो. त्यामुळे सरांशी चांगली ओळख होती. सरांनी प्रयत्न करुन संभाला अँडमिशन मिळवुन दिली. फी चे पैसे देखिल मी आणि सरांनी मिळुन भरले."आता नाईट कॉलेज मध्ये जावुन जागरणं करायची गरज नाही. आणि काही पैसे वगैरे लागले तर सांगत जा...!"त्याची नेहेमीचीच प्रतिक्रिया...डोळे भरलेले आणि हात जोडलेले....!
त्या कंपनीत वर्षभर होतो मी त्यानंतर. मग मध्येच हि सद्ध्याची OmniSTAR B.V. ची ऑफर आली. आणि मी ती कंपनी सोडली. जाताना संभाला सांगुन गेलो होतो कि काही लागलं तर फोन कर म्हणुन.वर्षभर संभाचे फोन येत राहिले. खुशाली कळवणारे. मागणी मात्र कधीच नव्हती. ते त्याच्या स्वभावातच नव्हतं म्हणा. नंतर हळु हळु फोन बंद होत गेले. माझाही व्याप वाढत होता , पगाराबरोबर दौरेही वाढले होते. मी ही हळु हळु विसरुन गेलो. मागे एकदा असेच ठाण्याला गेलो असता जुन्या ऑफिसमध्ये चक्कर टाकली तेव्हा कळले की संभाने नोकरी सोडली. परिक्षेच्या वेळेस त्याला एक महिन्याची सुटी हवी होती अभ्यासासाठी. कंपनीने नाकारली....संभाने नोकरी सोडली यात मला काही विशेष वाटले नाही. कारण त्याचे शिक्षणाचे वेड मला चांगले माहित होते.
त्यानंतर असेच काही दिवस गेले. आमचे दोनाचे चार हात झाले. कुर्ल्याहुन मी खारघरला शिफ्ट झालो.आणि एके रविवारी सकाळी सकाळी संभाची स्वारी अगदी आईसोबत माझ्या दारी अवतिर्ण झाली.आल्या आल्या माझ्या आई आण्णांच्या पाया पडला. माझ्याकडे यायच्या आधीच मी खुर्चीवर मांडी घालुन बसलो."कुर्ल्याला गेलो होते सर. तिथे शेजारी समजलं की तुम्ही खारघरला शिफ्ट झाला आहात म्हणुन मग शोधत शोधत इथे आलो. आई हेच ते विशालसर , ज्यांच्या बद्दल मी नेहेमी बोलत असतो."त्या माऊलीने हात जोडले.." लई उपकार जाले सायेब, तुमच्यामुळं माज्या पोराची जिनगानी सुदरली.."मला उगाच लाजल्यासारखं झालं. आई आण्णांना तर काय चाललंय ते काहीच कळत नव्हतं. मी त्यांना हळुच खुणावलं..नंतर सांगेन म्हणुन...."विशालसर बी. ए. झालो, इंग्लिष घेवुन. तुमची खुप मदत झाली सर ", त्याने नेहेमीप्रमाणेच भरल्या डोळ्यांनी हात जोडले. मी त्याचे हात हातात घेतले आणि म्हणालो.."संभाजीराव श्रेय द्यायचे असेल तर ते तुमच्या आईला, तिच्या मेहनतीला द्या. मी फक्त हातचं काही न राखता शक्य तेवढी मदत केली. बाकी सगळं श्रेय तुझी चिकाटी, परिश्रम आणि अभ्यासाचं आहे. असो..आता पुढं काय करणार आहेस.""सर, विवेकानंद केंद्र , कन्याकुमारीच्या अरुणाचल प्रदेशमध्ये एकुण अठरा निवासी शाळा आहेत. त्यापैकीच एका शाळेत इंग्लिश शिकवायला चाललोय. शिक्षणाचं महत्व मला कळालंय. त्याचा फायदा तिथल्या गरिब मुलांना झाला तर बघतो. पगार नाही मिळणार फार..पण मी ठरवलंय लग्न करायचं नाही म्हणुन. आणि मी व माझी आई....आम्हा दोघांना असं कितीसं लागतंय. येतो सर. तुम्हाला न भेटता गेलो असतो तर मनाला खात राहिलं असतं..आता चिंता नाही."
त्या माय लेकांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघताना मला माझा खुजेपणा अगदी प्रकर्षाने जाणवला. मी नकळतच हात जोडले.
विशाल.



No comments: